दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?
दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून – वाचनालयांतून – घरोघरी – देशी – परदेशी – रद्दीवाल्याकडे – तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे… रिसायकल होत राहतात. दुसर्या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.
’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.
तरीही… तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्या – चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्या ’मौजे’पर्यंत… धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्या ’शब्द’पर्यंत… काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’…
किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच…
या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!