आठवणीतली दिवाळी…
“झाली का दिवाळीची खरेदी?” मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
“नाही अगं अजून. पिल्लूची झाली.” ती
“तुझी कधी?? काय घेणार आहेस?” परत मी
“अगं, बहुतेक काहिच नाही… काय घेणार? सगळं भरपूर आहे
“
“डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात ” माझा आगाऊपणा.
“हाहाहा…..” जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.
सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे…दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा….सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली…. लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय
पण गणपती, दिवाळी…खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन…. परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते…. दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ…वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!
सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी
मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट
बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं…. माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा…सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी….मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.
आई ची फराळाची तयारी चालू व्हायची….. त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही
जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली
दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या…. मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा…सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल
) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा….हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा…. आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा……..
बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा…..ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची
फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी…..सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले……’
आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.
आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले….. मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा “काय घेऊ? सगळं आहे” असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही….मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते….. पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!
from http://badbadi-snehal.blogspot.com/2007/11/blog-post.html
Filed under: Uncategorized Tagged: | दिवाळी
Heart Touching……….
Lahanpanichya aathvani vachun ani lahanpan sample he janavun dolyat pani aale.
Mi tumacha lekh vachala, pan ase vatale ki tumhi tumchya baddal nahi tar mazya baddal lihil aahe, kharach gele te diwas. lahanpanicya athvani kharch lupt hot aahet kahitari ase blog vachele ki manala bar vatat.
maza email id aahe..nskhandare@rediffmail.com